गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता. २७ : मागील आठवड्यात सतत तीन दिवस जोरदार पाऊस आल्यामुळे पूर्व विदर्भातील ८८८ विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. यामुळे महावितरणला तब्बल ५४ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. पावसामुळे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १८५ विद्युत खांब तुटल्याची नोंद महावितरणने घेतली आहे.
मागील आठवड्यात २२, २३ व २४ जुलै असे तीन दिवस संततधार पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे खांब आणि तारांवर पडली. शिवाय जमीन ओलीचिंब झाल्यामुळे खांब वाकले. यामुळे पूर्व विदर्भात उच्च दाबाचे २३५, तर लघुदाबाचे ६५३ खांब कोसळले आणि तब्बल ५६६ खांब वाकले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात उच्च लघुदाबाचे ५९, तर लघुदाबाचे १२६ खांब कोसळले़ भंडारा जिल्ह्यात उच्चदाबाचे १०२, तर लघुदाबाचे २३२ खांब तुटले. गोंदिया जिल्ह्यात उच्चदाबाचे ३७, तर लघुदाबाचे १४८ खांबांचे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात उच्चदाबाचे ३५, तर लघुदाबाचे १४९ खांब तुटले. पाचही जिल्ह्यात पावसामुळे ५६६ खांब वाकले आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने तुटलेले खांब व वीज तारांचा वीजपुरवठा बंद केला आहे. महावितरणचे कर्मचारी तुटलेले खांब व वीज तारा जोडण्याच्या कामात व्यस्त आहेत. नागरिकांनी तुटलेले खांब व तारांना स्पर्श करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे़