गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात शंभर टक्के विद्युतीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला.
राज्यभरातील १९२ गावांत हे अभियान राबविण्यात येणार असून, यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत असून सौभाग्य योजनेतून दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानाची राज्यात आजपासून सुरूवात झाली असून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंत्यानी क्षेत्रीय स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.संजीव कुमार यांनी व्हीडीओ कॉन्फरेन्सद्वारे आज दिले..
राज्यातील ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा १९२ गावात शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असून यात विदर्भातील १४० गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर लावण्यात येणार असून या शिबिरात लाभार्थींना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे, अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अभियाना अंतर्गत चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर जिल्ह्यातील ७ व गडचिरोली जिल्ह्यातील ८ गावांतील शंभर टक्के घरांना वीज जोडणी देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या दरम्यान संपूर्ण राज्यात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये राज्यातील ज्या गावात दलितांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे व गरीब कुटुंबांचे प्रमाणही जास्त आहे अशा गावात सौभाग्य योजनेतून वीज नसलेल्या सर्व कुटुंबीयांना वीज जोडणी देण्यात येणार आहे
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी अशा सर्व १९२ गावात मोठया संख्येत शिबिर लावण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थींनी सहभागी होऊन, सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे