/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.५: आदिवासींनी निसर्गाशी जोपासलेले नाते आणि त्यांची जीवन जगण्याची कला अदभूत आहे. देशवासीयांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे आणि त्यांच्यासोबत मिळून त्यांच्या समग्र विकासासाठी आपण कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. मागास समुहाच्या उत्थानात शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण आहे. हा समूह पुढे जाऊ इच्छितो. मात्र, त्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे आणि गोंडवाना विद्यापीठाने त्यादृष्टीने उचित पावले उचलली आहेत, असे सांगून श्रीमती मुर्मू यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. केंद्र सरकारने आकांक्षित जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्हृयाचा समावेश केला आहे. त्यामुळे भविष्यात हा जिल्हा प्रगत जिल्ह्यांच्या पहिल्या रांगेत येईल, असा विश्वासही मुर्मू यांनी व्य्क्त केला.
देशात युवकांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी आपली प्रतिभा आणि कौशल्याचा वापर करुन पुढे वाटचाल केली तर देशाबरोबरच तुमचेही नाव मोठे होईल, असे मुर्मू म्हणाल्या. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ठ शैक्षणिक कामगिरीसाठी ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दीक्षांतस मारंभात सुमारे ४५ पदवीधर आणि ६१ टक्क्यांपेक्षा जास्त सुवर्णपदक विजेत्या या विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनींची कामगिरी ही कौतुकास्पद असून महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. इतर विद्यार्थिनींना यापासून प्रेरणा मिळेल. गोंडवाना विद्यापीठ हे या क्षेत्रातील वनसंपदा, खनिज संसाधन, आदिवासींची कला आणि संस्कृतीच्या योग्य विकास आणि संरक्षणासाठी कार्यरत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
गोंडवाना विद्यापीठामध्ये अनुभवाधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी बांबूक्राफ्ट, वनव्यवस्थापन यासारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून या विद्यापीठात आदिवासी संशोधन केंद्रसुद्धा कार्यरत आहे, या केंद्रात स्थानिकदृष्ट्या उपयोगी विषयावर संशोधन केलं जात आहे, असे राष्ट्रपती यांनी सांगितले. राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राची ही आपली पहिलीच यात्रा असून या दौऱ्यादरम्यानचा पहिलाच कार्यक्रम युवा पिढीशी निगडित असणारा दीक्षांत समारोहआहे, असेही त्यांनी सांगितले.
विशेष दृष्ट्या असुरक्षित आदिवासी समुदायासोबत आपण वेळोवेळी संवाद साधत असून गेल्याच महिन्यात राष्ट्रपती भवनात या आदिवासी समुदायातील बांधवांना आपण आमंत्रित केले होते, असे राष्ट्रपतींनी सांगितले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीयइ मारतीचे व्हर्च्युअल पद्धतीने भूमिपूजनही करण्यातआले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले.
या समारोहाला खा.अशोक नेते, आ.डॉ.रामदास आंबटकर, आ.सुधाकर अडबाले, आ.क्ष्णा गजबे, आ.डॉ.देवराव होळी यांच्यासह माजी कुलगुरु, अधिष्ठाता, सिनेट व व्यवस्थापन समितीचे सदस्य,विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांचे संस्थापक, प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
…………………