गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२५: तेलंगणा राज्यात दोन जणांचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्यात परतणाऱ्या रानटी हत्तीने आज भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास ठार केले. गोंगलू रामा तेलामी(३८) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
३ एप्रिलला एक रानटी हत्ती मुलचेरा तालुक्यातील प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यात गेला होता. तेथील कुमुरमभीम जिल्ह्यातील चिंतलमानेपल्ली तालुक्यातील बुरेपल्ली येथील दोन शेतकऱ्यांना या हत्तीने तुडवून ठार केले. त्यानंतर हा हत्ती ६ एप्रिलला पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. सिरोंचा वनविभागातील बल्लाळम जंगलात बरेच दिवस मुक्काम ठोकल्यानंतर या हत्तीने २३ एप्रिलला अहेरी तालुक्यात प्रवेश करुन चिरेपल्ली येथील एका किराणा दुकान आणि धान्याची नासधूस केली. त्यानंतर या हत्तीने भामरागड वनपरिक्षेत्रात प्रवेश करुन आज दुपारी ४ वाजताच्या सुमारस कियर येथील शेतकरी गोंगलू तेलामी यास ठार केले. तेलामी हे शेतात काम करीत असताना हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
या हत्तीवर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी तैनात असून, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा धनादेश नंतर देण्यात येईल, असे गडचिरोली वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांनी सांगितले.