गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३१: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मूख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, ज्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरलेले नाही, अशा ग्राहकांना तत्काळ जागेवरच वीजबिल दुरुस्ती करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येणार आहेत. नववर्षारंभी १ जानेवारीपासून या मेळाव्यांची व्याप्ती तीव्रतेने वाढविण्यात येणार आहे.
महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात आयोजित या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कृषिपंपधारकांनी त्यांच्या तक्रारींचे निराकरण त्वरीत होण्याच्या दृष्टीने तक्रार असलेल्या बिलाची प्रत किंवा ग्राहक क्रमांक व मीटरवरील चालू रिडींगची नोंद सोबत आणण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. या मेळाव्यात तक्रारींची खातरजमा करून सुधारीत बिल जागेवरच देण्यात येणार आहे.
राज्याचे ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे महावितरणच्या विविध उपविभागीय कार्यालयांत या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून, 'मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७' मध्ये तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा करून सहभागी झालेल्या कृषिपंप ग्राहकांने वीज बिल दुरुस्तीसाठी अर्ज केला असेल, तर त्याचा वीजपुरवठा योजनेतील तरतुदींप्रमाणे पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत खंडित करण्यात येऊ नये. मात्र, ज्या ग्राहकांनी सवलतीच्या दरानेसुद्धा तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा केला नसेल, अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा, अशा सूचनाही महावितरणतर्फ़े सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
वीज बिलांची दुरुस्ती करीत असतांना ग्राहकाचा मंजूर आणि जोडलेला विद्युत भार, मीटरवरील वीज वापराची नोंद, वाहिनीवरील वीज वापराचा निर्देशांक, वीज वापराचे तास आदी बाबी संबंधित उपविभागीय कार्यालयांनी विचारात घ्याव्यात, याशिवाय संबंधित कार्यकारी अभियंता यांनी रोहित्रावरील सर्व कृषिपंपधारकांनी थकीत वीज देयकातील तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा केला असल्यास ते नादुरुस्त रोहित्र तीन दिवसांच्या आत अग्रक्रमाने बदलून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत पहिला हप्ता व त्यानंतरच्या सर्व हप्त्यांचा भरणा करण्याच्या मूळ मूदतीत तीन महिने वाढही देण्यात आली आहे.
कृषिपंपधारकांच्या तक्रारींची दखल घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजबिल दुरुस्तीसाठी मेळावे घेण्याची सूचना महावितरणला केली होती, याअनुषंगाने हे मेळावे घेण्यात येत असून कृषिपंप ग्राहकांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.