गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१७: कृषी विभागाच्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेत गडचिरोली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याला १५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत जिल्हयात २३१९ शेततळयांची कामे पूर्ण झाली आहेत.
ही योजना जाहीर झाल्यावर सर्वाधिक प्रतिसाद मिळालेल्या गडचिरोली जिल्हयात ६५४९ अर्ज ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांनी दाखल केले होते. ३१ मार्च २०१८ अखेर जिल्हयात २३१९ शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली आणि जून २०१८ अखेर एकूण पूर्ण कामांची संख्या ३५०० पर्यंत पोहचेल, असा अंदाज आहे.
या योजने अंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरीता १५०० शेततळे निर्माण करण्याचे लक्ष्यांक प्राप्त झालेले असून ३१ मार्च २०१८ पर्यंत गडचिरोली जिल्हयात ६५४९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी ६४६२ लाभार्थींनी सेवाशुल्क भरलेले असून ५९५४ लाभार्थी निकषानुसार पात्र आहेत. त्यापैकी ३२८३ लाभार्थींना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून २३१९ शेततळयांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ६०८.१२ लाख रुपयांचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर अदा करण्यात आले आहे.
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून उपलब्धता वाढविण्यासाठी सद्य:स्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांकडे स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे.