गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१९: युवक काँग्रेस व लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि आंदोलनाच्या इशाऱ्यापुढे नमते घेत येथील गोंडवाना विद्यापीठाने दीक्षांत समारंभ चंद्रपूरला घेण्याचा निर्णय बदलला असून, नवी अधिसूचना जारी करीत हा समारंभ आता गडचिरोली येथेच घेण्याचे जाहीर केले आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या २०१९-२० या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांना पदव्या आणि सुवर्णपदके बहाल करण्यासाठी विद्यापीठाने आपला आठवा दीक्षांत समारंभ २८ जानेवारी २०२१ रोजी चंदप्रूर येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे आयोजित केला होता. मात्र, यावर युवक काँग्रेसने सर्वप्रथम आक्षेप घेत दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच घेण्याची मागणी केली होती. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन व मंत्र्यांनाही निवेदन दिले होते. त्यानंतर आ.डॉ.देवराव होळी, आ.डॉ.रामदास आंबटकर, भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांच्यासह काही सामाजिक संघटनांनीही दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे घेण्यावरुन नाराजी प्रकट करीत दीक्षांत समारंभ गडचिरोलीतच घेण्याची मागणी रेटून धरली होती. आ.डॉ.होळी यांनी माजी वित्तमंत्री, आ.सुधीर मुनगंटीवार यांना निवदेन दिले होते. पुढे हा मुद्दा राजभवनापर्यंत गेल्यानंतर गोंडवाना विद्यापीठाने आज अधिसूचना जारी करीत आपला दीक्षांत समारंभ गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे जाहीर केले आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे राहणार असून, बंगलोर येथील ‘नॅक’चे संचालक डॉ.एस.सी.शर्मा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ.अनिल चिताडे यांनी दिली.
श्रेयासाठी चढाओढ
विद्यापीठाने आपला निर्णय बदलल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये श्रेयासाठी चढाओढ सुरु झाल्याचे दिसत आहे. युवक काँग्रेसने केलेला पाठपुरावा आणि आंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच गोंडवाना विद्यापीठाला गडचिरोली येथे दीक्षांत समारंभ घेण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केली, तर आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच विद्यापीठाला निर्णय बदलावा लागल्याचे आ.डॉ.देवराव होळी यांनी म्हटले आहे.