गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२३:जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाने धानाची खरेदी केली आहे. निश्चित केलेल्या एजन्सीकडून खरेदी केलेल्या धानाची उचल व भरडाई केली जाते. मात्र, १ लाख क्विंटल धान अजुनही खरेदी केंद्रांवर पडून आहेत. धान पावसात भिजून खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्वरेने संबंधित एजन्सीजनी धानाची उचल करुन भरडाई करावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हयातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट देसाईगंज येथे आले होते. त्यांनी तेथील धान भरडाई केंद्राला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आयुक्त रमेश आडे, सचिव सुपे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, भरडाई मिल मालक श्रीचंद आकाश अग्रवाल, किशन नागदेवे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना बापट म्हणाले की, भरडाई केलेले तांदूळ गोदामात व्यवस्थितरित्या ठेवण्यात यावे व मागणीनुसार पुरवठादारांना त्वरेने वितरीत करावे. यामुळे गोदामाबाहेर ताडपत्री टाकून धान्य ठेवण्याची परिस्थिती उदभवणार नाही. त्याचबरोबर शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या मागणीनुसार पुरवठादारांना आमंत्रित करुन तांदूळ हस्तांतरीत करावे,अशीही सूचना यावेळी त्यांनी दिली.