गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.८: चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून परत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाऊराव मारोती शेंडे(३४) रा.कुरुड, ता.चामोर्शी असे शिक्षा झालेल्या इसमाचे नाव आहे.
११ जून २०१८ ची संध्याकाळी साडेसहा वाजताची ही घटना आहे. पीडित मुलगी आपल्या भावासमवेत चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या आजीला जेवणाचा डबा आणून देण्यासाठी आली होती. परत जात असताना पाऊस व अंधाराचा फायदा घेत आरोपी भाऊराव शेंडे हा मोटारसायकलने मागून आला आणि त्याने मुलीचा विनयभंग केला. यामुळे पीडित मुलीने आरडाओरड करीत आपल्या भावाला बाजारसमितीत मदतीसाठी पाठविले. तसेच ती आरोपीच्या मोटारसायकलची चावी काढून बाजार समितीकडे जाऊ लागली. तेव्हा आरोपी भाऊराव शेंडे याने तिला ढकलून चावी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने चावी रस्याेंवर साचलेल्या पाण्यात फेकून जोराने मदतीची याचना केली. एवढ्यात रस्या तने येणाऱ्या एका इसमाने तिला घरी सोडून दिले.
पीडितेने ही आपबिती आपल्या भावाला सांगितल्यानंतर चामोर्शी पोलिस ठाण्यात आरोपी भाऊराव शेंडे याच्यावर भादंवि कलम ३५४, तसेच बा.लै.अ.प्र. कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक निशा खोब्रागडे यांनी आरोपीस अटक केली. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
आज या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी भाऊराव शेंडे यास दोषी ठरवून ५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतून पीडितेस २३ हजार रुपयांची मदत करण्याचा आदेशही न्यायालयाने पारित केला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी जबाबदारी सांभाळली