गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२८ : सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर शासनाने बंदी घातल्याचे कारण देत पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गोरगरीब पानठेलेचालकांवर धाडी टाकून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी आज (ता.२८) माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात पानठेलेचालकांनी कुरखेडा येथील एसडीओ कार्यालयावर धडक दिली.
मागच्या आठवड्यात पोलिसांनी काही पानठेलेचालकांना ताब्यात घेतल्याने ते धास्तावले असून, त्यांनी पानठेले बंद केले आहेत़यामुळे पानठेलेचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. बनावट दारू विकण्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र पानठेलेधारकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. आधीच खुल्या नोकरभरतीमुळे जिल्ह्यातील सुशिक्षित युवक बेरोजगार आहेत. त्यांनी एखाद्या स्वयंरोजगार सुरू केल्यास तोही हिरावला जातो. मग या तरुणांनी करायचे काय, असा सवाल यावेळी मोर्चेक-यांनी उपस्थित केला. प्रशासनाने पानठेलेचालकांवर धाडी टाकल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही सुरेंद्रसिंह चंदेल यांनी यावेळी दिला.
हा मोर्चा माजी जि.प. सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्र मोहबंशी, जि.प. सदस्य अशोक इंदूरकर, नरेंद्र तिरणकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी नेते चंदू नाकतोडे, विनोद मुळे, आशिष काळे, राहूल घोगरे, अमोल धाबेकर, वैभव बन्सोड, वसीम शेख, शाकीर शेख, हर्षल भानारकर, आबिद पठाण, विनोद मेश्राम, नरेंद्र बैस, संजय ठाकरे, देवा दखणे, जावेद शेख, खेमचंद मुंजनकर, भगवान सुतारे, यशवंत गुंडरे, सत्यपाल कागदे, मिलन वसोना, शिशुपाल जनबंधू, हिवराज ठलाल, महेश मेश्राम यांच्यासह शेकडो पानठेलेचालक सहभागी झाले होते.