गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२५: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, गडचिरोलीतील सुप्रसिद्ध समाजसेवक व 'सर्च' संस्थेचे संस्थापक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांना आरोग्यविषयक सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात अरविंद गुप्ता, सर्पदंश चिकित्सेसंबंधी लक्ष्मीकुट्टी, कला(चित्रकला, गोंड कला) क्षेत्रात भज्जू श्याम, समाजसेवा क्षेत्रात सुधांशू बिस्वास, पॅलएटीव केअर या क्षेत्रात एम.आर.राजगोपाल, क्रीडा क्षेत्रात मुरलीकांत पेटकर, विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये राजगोपालन वासुदेवन, सामाजिक कार्यात सुभाषिनी मिस्त्री, साहित्य व शिक्षण(स्वस्त शिक्षण) विजयलक्ष्मी नवनैतकृष्णन, आरोग्य क्षेत्रात सुलागत्ती नरसम्मा, यशी ढोढे, डॉ.अभय व डॉ.राणी बंग, सामाजिक कार्यात लॅटिना ए.ओ ठक्कर, वन्यजीव संरक्षणासाठी रोमुलस व्हाईटेकर, सोशल वर्कमध्ये संपत रामटेके यांचा समावेश आहे. संपत रामटेके यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांनी सिकलसेल या आजारासंदर्भात जनजागृती व उपचार याविषयावर संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. दिवंगत संपत रामटेके हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील रहिवासी असून, ते अभियंता होते. नागपुरात राहून त्यांनी सिकलसेलविषयी मोठे काम केले.
गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे सर्च संस्थेच्या माध्यमातून डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या आरोग्यसेवेसाठी खर्ची घातले आहे. त्यांनी तयार करुन जिल्ह्यात राबविलेल्या 'घरोघरी नवजात बाळाची काळजी' हा कार्यक्रम देशातील अन्य राज्ये व परदेशांमध्ये राबविण्यात येत आहे. बंग दाम्पत्याला यापूर्वी महाराष्ट्र भूषण व अन्य महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.