गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२६: मागील २० दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेल्या मेडीगड्डा धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची गडचिरोली येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडली. इतक्या दिवसांपासून आम्ही उपोषणाला बसलोय पण प्रशासनाकडून कुणीही आमची विचारपूस करायला आलेला नाही. अशी तक्रारदेखील केली.
तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा धरणामध्ये जमीन गेलेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांना अद्याप मोबदला दिलेला नाही. प्रस्तावित जमिनीपैकी तत्काळ गरज असलेली जमीन थेट खरेदी केली. मात्र, उर्वरित जमिनीचा मोबदला अद्याप दिलेला नाही. त्यामुळे पीडित शेतकरी तीन वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. मागील वीस दिवसांपासून ते साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्यांच्याकडे शासन, प्रशासनाकडून कुणीही विचारपूस करायला गेला नाही.
या शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आज शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल अवगत करून दिले. यावेळी जयंत पाटील यांनी आपण हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आ.श्यामसुंदर शिंदे, प्रा.एस.व्ही.जाधव, रामदास जराते उपस्थित होते.